अन्यायाविरुद्ध हौतात्म्य!
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
तुरुंगात हिंदुस्थानी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या अमानवी वागणुकीच्या निषेधार्थ लाहोरच्या तुरुंगात ६३ दिवस उपोषण करून प्राणत्याग करणाऱ्या जतीन्द्र नाथ दास यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी आपल्या बलिदानाने ब्रिटिश सरकारचा क्रूर चेहरा जगासमोर आणला.
कलकत्यात २७ ॲाक्टोबर १९०४ रोजी जन्मलेल्या जतींद्रनाथने मृत्यूला कवटाळले तेव्हा त्याचे वय अवघे २४ वर्षांचे होते. या मृत्यूचे वृत्त पसरताच ब्रिटिश सरकारची तारांबळ उडाली व तातडीने तुरुंगांतील व्यवस्था सुधारण्यासाठी सुरुवात केली. गोलमेज परिषदेतही त्याचे पडसाद उमटले.
जतींद्रनाथांचे पार्थिव लाहोरहून कलकत्यात रेल्वेने नेण्यात आले. सुप्रसिद्ध क्रांतिकारक दुर्गा भाभी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. प्रत्येक स्टेशनवर शेकडो लोक अंत्यदर्शनासाठी जमत होते. कलकत्यात त्यांच्या अंत्यविधीला इतकी गर्दी झाली की, या अंत्ययात्रेची लांबी दोन मैलाहून अधिक होती.
क्रांतिकार्यांत सहभागी झाल्याच्या आरोपाखाली जतींद्रनाथना तुरुंगात डांबण्यात आले होते. तिथे ब्रिटिश कैदी व भारतीय स्वातंत्र्यसैनिक यांना वेगळी वागणूक मिळत असे. अस्वच्छ कपडे, निकृष्ट अन्न व कोठडींमध्ये उंदिर, घुशी व झुरळांचा सुळसुळाट यामुळे अनेक स्वातंत्र्यसैनिक आजारी पडत. जतींद्रनाथांनी त्या विरुद्ध तुरुंगातच लढा उभारला होता.
जतींद्र नाथ दासांनी तुरुंगात देह ठेवला पण त्यांच्या हौतात्म्याने देशभर ब्रिटिश विरोधी संतापाचे अंगार फुलले.
त्यांच्या स्मृतींना आदरांजली !