राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिशन घरवापसी सुरू, भाजपचे अनेक आमदार पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत.
महाराष्ट्र मिरर टीम -मुंबई
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेत राष्ट्रवादीकडून लवकरच मिशन घरवापसी राबवण्यात येणार असल्याचीचर्चा रंगू लागली आहे. गयारामांना पुन्हा पक्षात घेण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिल्याचीही माहिती पुढे आली आहे. या सगळ्यावर आता राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
‘विधानसभा निवडणुकीपूर्वी जे आमदार भाजपमध्ये गेले त्यांना तिथं कुठलीही किंमत नाही. त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादीत येण्याच्या विचारात आहेत. हे आमदार, शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत संपर्कात आहेत. असे आमदार स्थानिक राजकारणाचा विचार करून लवकरच पक्ष प्रवेश करणार आहेत,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी नवाब मलिक यांनी पार्थ पवार यांच्याबाबतही भाष्य केलं आहे. ‘पार्थ युवा नेते आहेत. त्यांचा अनुभव कमी आहे. पार्थ यांनी केलेलं वक्तव्य गांभीर्य घेण्यासारखे नाही. तरुणांकडून चूका होतात त्यात सुधारणा करता येतात,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं.