आरळा पाणी प्रश्नासाठी काँग्रेसची आरपारची लढाई
उमेश पाटील -सांगली
आरळा तालुका शिराळा येथील आरळा िद्धार्थनगर पाणीप्रश्नासाठी आता काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. काँग्रेस पक्षा कडून पाणीप्रश्न निकाली लावण्यासाठी आरपारची लढाई लढली जाणार असल्याची प्रतिक्रिया शिराळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अँड.रवी पाटील यांनी व्यक्त केली.
आरळा येथील सिद्धार्थ नगर पाणी प्रश्नाबाबत स्थानिक कार्यकर्ते यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.
यावेळी बोलताना ऍड.पाटील म्हणाले, नागरिकांना पाणी, रस्ते, गटर, दिवाबत्ती इत्यादी व्यवस्था होण्यासाठी १९५५ ला आरळा ग्रामपंचायतीची स्थापना झाली. दलित वस्ती सुधारणा योजनेखाली कित्येक लाख रुपयांचा चुराडा झाला. परंतु या नगरातील नागरिकांना त्याचा फायदा झाला नाही. मध्यंतरी आपण शेकडो स्थानिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सरपंच यांना दिले. स्थानिक प्रश्नाबाबत सिद्धार्थनगर येथे विशेष ग्रामसभा घेण्याचे त्यांनी टाळले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सोडता पाणीपट्टी मात्र भरून घेतली जाते. या सर्वातून आपले जीवन सुसह्य करणारे प्रशासन हेच आपले शोषण करत आहे हे स्पष्ट होते.
चांदोली धरण व वारणा नदी बारमाही वाहत असताना पिण्याचे पाणी न मिळणे याच्या इतका लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा असूच शकत नाही.येत्या दहा दिवसात सिद्धार्थ नगर मधील पाणीप्रश्न न सुटल्यास आम्ही काँग्रेस पदाधिकारी आमच्या घरी जायला आम्ही पात्र नाही असे समजून जोपर्यंत पाणीप्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही घरी न जाण्याचा आत्मक्लेश करू असे जाहीर केले.
बुधाजी झाडे व जगन्नाथ परुळे यांनी आज शिराळा तालुका काँग्रेस चे अध्यक्ष अँड.रवि पाटील यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले होते. यावेळी काँग्रेसचे राजाभाऊ चरणकर,संजय नायकवडी, सुनील घोलप तर सिद्धार्थ नगर मधील निवृत्ती झाडे,अशोक झाडे, यशवंत कांबळे,साधना गुंजाळ, श्रीमती कलाबाई झाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.