सामाजिक बांधीलकी, परंपरा आणि संस्कृती जपत ५० वा घरगुती गणेशोत्सव साजरा
यंदा कोरोना पार्श्वभूमीवर " घरी रहा सुरक्षित रहा " असा मौलिक संदेश देणारे वरोऱ्याचे पाटील कुटुंबीय
राजेंद्र मर्दाने-वरोरा चंद्रपूर
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप दिले. या सार्वजनिक उत्सवास १२६ वर्ष पूर्ण होत असताना वरोऱ्यातील पप्पू पाटील (रडके) कुटुंबीयाने जनजागृतीचा उद्देश नजरेसमोर ठेवून धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले आहे. पप्पू पाटील (रडके) कुटुंबातील घरगुती गणपती यंदा ५० वे वर्ष साजरे करीत आहे. या घरगुती गणपतीची सुरुवात त्यांच्या वडिलांनी (कै.अण्णाजी कृष्णाजी पाटील) १९७० साली केली होती. त्याच्यानंतर आजही हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. कोरोना पार्श्र्वभूमीवर सामाजिक बांधीलकी, परंपरा आणि संस्कृती जपत " घरी रहा, सुरक्षित रहा " असा मौलिक संदेश देत ५० वा घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
यंदाच्या कोरोना पार्श्वभूमीवर पप्पू पाटील यांनी शिव परिवार ( भगवान शिव, माता पार्वती, कार्तिके, गणेश, नंदी, अशोक सुंदरी, साप ) इत्यादी रक्तबीच (कोरोनाला) संपविण्यासाठी माता महाकालीच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनांचा देखावा मांडण्यात आला आहे.
डोळे दिपवणारी रोषणाई, मोठा थाटमाट, उंच गणेश मुर्ती, पाटील यांच्या येथील घरगुती उत्सवात दिसत नसली तरी पाटील यांनी रोजच्या वापरातील वस्तूंना कलाकुसरीची जोड देत उभ्या केलेल्या समाजप्रबोधनात्मक देखाव्याने उत्सवाला चार चाँद लावले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे.
म्हणतात ना परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी. त्यानुसार आपल्या छोट्याश्या नौकरीतील पगारातून दर महिन्याला थोडी - थोडी बचत करून त्यातून जमा झालेल्या रकमेतून दरवर्षी गणेशोत्सवात काही तरी नवीन करण्याचा पप्पू पाटील (रडके) यांचा मानस असतो. यावर्षी सुद्धा त्यांनी कोरोना ही थीम देखाव्यासाठी निवडली.
पौराणिक कथा आणि सामाजिक विषय यांची व्यवस्थित सांगड घालून देखाव्यांची रचना केली. त्यांनी कोरोनाला रक्तबीच राक्षसाची उपमा दिली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वोत्तम सुरक्षित उपाय म्हणजे घरीच्या घरीच राहणे. त्यासाठी शिव परिवारातील माता पार्वती दररोज वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवित आहे. दुसरीकडे भगवान शिव व कार्तिके चौसट खेळाच्या माध्यमातून कोरोना संकटावर मात करण्यासाठी उपाय शोधित आहे. बालक गणेशला खेळायला मिळत नसल्याने तो नाराज आहे. कोरोनाला घेऊन शिव व्यथित आहे. यावर शिवशंकर हे माता सरस्वती, श्री विष्णूला याबाबत विचारणा करतात. रक्तबीच राक्षसाचा संहार करण्याची शक्ती माता महाकालीकडे असल्याने ती जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाते.
रक्तबीचच्या शरीरातून रक्ताचा एक थेंबही पडला की तसाच दुसरा रक्तबीच तयार होणार, असे ब्रह्म देवाचे वरदान रक्तबीचला मिळाले आहे. त्यामुळे जमिनीवर रक्ताचा एक थेंबही न पडता त्याचा वध कसा करायचा हा मोठा बिकट प्रश्न असताना माता महाकाली ने जमिनीवर रक्ताचा एक थेंबही न पडू देता रक्तबीचा शिरच्छेद केला. रक्त जमिनीवर पडणार नाही यासाठी मोठ्या वाट्याचा वापर केला. अर्थात सॅनिटायझर युक्त वाट्यात कोरोना पडला की तो पुन्हा जिवंत होणार नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरी रहा सुरक्षित रहा, सॅनिटायझर वापरा, असा संदेश देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
गणेश विसर्जन १ सप्टेंबरला बावणे ले आऊट, जिजामाता वार्ड येथील राहत्या घरा समोरील अंगणात ठेवलेल्या पवित्र जलकुंडात होणार आहे. नंतर जलकुंडाचे पाणी झाडांना देऊन जमा झालेली माती पुन्हा मूर्तीकारास देऊन पर्यावरण संरक्षणात खारीचा वाटा उचलणार, असे पप्पू पाटील यांनी अभिमानाने नमूद केले.