शेतकऱ्यांचे रिलायन्स गॅस कंपनी विरोधात साखळी उपोषण
प्रकल्पग्रस्तांची शासनाकडे मदतीसाठी याचना...
नरेश कोळंबे-महाराष्ट्र मिरर कर्जत
कर्जत तालुक्यातील विविध गावांतून रिलायन्स गॅस कंपनीची पाईप लाईन गेली आहे.परंतु काही ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करत त्यांच्या जमिनीचा मोबदला न देता कंत्राटदारांकडून व अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे शोषण केले गेले. त्याबाबत सर्व गावांतील शेतकरी एकत्र येऊन आज तहसील कार्यालय कर्जत येथे उपोषणाला बसले आहेत.
कर्जत मधील अनेक गावांमधून रिलायन्स कंपनीची गॅस पाईप लाईन गेली आहे. या गावांतील काही शेतकऱ्यांची वेगवेगळ्या बाबतीत फसवणूक करण्यात आली आहे. भूमी अधिग्रहण होऊन दोन वर्ष उलटली असली तरी कोणत्याही प्रकारची भरपाई मिळाली नाही, काहींना अर्धवट मोबदला दिला आहे .काही शेतकऱ्यांना दिलेले धनादेश बाऊन्स झाल्याने शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही.तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची व कालव्यांची खोदकाम करतेवेळी नासधूस केली ती पूर्ववत न करता ती कामे अर्धवट तशीच ठेवली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. तसेच काही पुढारी लोकांनी खोटी माणसे दाखवून पंचनामे केले अश्या सर्वावर कारवाई करण्यात यावी यासाठी या 40 शेतकऱ्यांकडून कायम शासन दरबारी पत्रव्यवहार केला गेला परंतु त्याला कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने भिक न घातल्याने आज या सर्व शेतकऱ्यांनी कर्जत तहसील येथे बेमुदत साखळी उपोषणला सुरुवात केली आहे. जोपर्यंत शासन याकडे लक्ष देऊन आमचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही व ते अजून तीव्र करू असा इशारा शेतकऱ्यांनी बोलता वेळी सरकारला दिला. यावेळी निलेश राणे, सुरेश खाडे, रमेश कालेकर,संगीता म्हस्कर , रघुनाथ तरे आदी ग्रामस्थांनी आपापली मते मांडत शासनाकडे योग्य न्यायासाठी मागणी केली .
या उपोषणाची दखल घेत भाजप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सदर शेतकऱ्यांची फोन करून चौकशी करत न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व शेतकऱ्यां च्या पाठीशी भाजपा उभी असल्याचे सांगत योग्य न्यायासाठी स्वतः जातीने या गोष्टीचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कर्जत मधील भाजपचे कर्जत शेतकरी मोर्चा सरचिटणीस सुनील गोगटे, रमेश मुंढे, राजेश भगत यांनी कर्जत भाजप पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचे सांगितले .