जिगरबाज मल्ल!
ॲालिम्पिक्ससारख्या स्पर्धा सोडायच, आयपीएलमध्ये राखीव खेळाडू म्हणून निवड झाली तरी लाखो रुपये कमावणाऱ्या खेळाडूंच्या काळात केवळ स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून हजारो रुपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन मैदानात लढणारे व
स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ॲालिम्पिक पदक मिळवून देणारे वीर खाशाबा जाधव यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या जिगरीस सलाम!
आज खेळाडूंना अनेक सवलती मिळत आहेत, पण ज्या काळी ॲालिम्पिक्स खेळण्यासाठी प्रवास भाडेही मिळत नव्हते, त्या काळात गरीब कुटुंबातील खाशाबांनी हा पराक्रम गाजवला, हे विशेष.
१९५२च्या हेलसिंकी (फिनलँड) ॲालिपिक्स स्पर्धेत खाशाबांनी कांस्य (ब्राँझ) पदक जिंकले. केवळ प्रशिक्षक व भारतीय अधिकाऱ्यांचा गैरसमजुतीमुळे ते पुढील फेरीसाठी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांची रौप्य पदकासाठी लढण्याची संधी हुकली.
घरातले शेंडेफळ असणाऱ्या खाशाबाला लहानपणापासून खेळण्याची फार आवड होती. पोहोणे, कुस्ती, कबड्डी, धावणे या सगळ्याच गोष्टी त्याला आवडत आणि त्यात तो पटाईतही होता. कुस्तीचे सुरुवातीचे धडे तर त्याने आपल्या वडिलांकडूनच घेतले. थोड्याच काळात तो आसपासच्या परिसरात कुस्तीगिरीसाठी ओळखला जाऊ लागला. आंतर कॉलेज स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवू लागला. इतकेच नव्हे तर देशभरातही त्याचे नाव व्हायला लागले. नंतर बळवडे आणि बेलापुरे गुरुजी यांनीही त्याला प्रशिक्षण दिले.
खाशाबाची १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकसाठी निवड झाली. या जाण्यायेण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करून पैसा गोळा करावा लागला होता. मॅटवर खेळणे भारतात नवीनच होते त्याची तयारीही करावी लागली होती. त्यावेळी तो फ्लायवेट विभागात खेळला होता आणि सहावे स्थान मिळवले होते. भारतासाठी ही फारच मोठी कामगिरी होती. त्यानंतर पुन्हा चार वर्षांनी हेलसिंकी ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेत स्थान मिळवून प्रवेशही मिळवला.
प्रवेश तर मिळाला पण जायचा यायचा खर्च करण्याचा प्रश्न होताच. सरकारकडून याही वेळी कुठलीच मदत मिळाली नव्हती. त्यावेळी कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजचे प्राचार्य खर्डेकर व शहाजी लाॅ काॅलेजच्या प्रा. दाभोळकरांनी आपले घर गहाण ठेवून पैसे गोळा केले. ते जाण्यायेण्याच्या खर्चासाठी वापरता आले. खाशाबाच्या कराडमधल्या गावातल्या दुकानदारांनी धान्य आणि इतर वस्तू पुरवल्या आणि खाशाबाला हेलसिंकीला धाडले.
त्यावेळी तिथे पोहोचल्यावर रहाण्यासाठी, खाण्यासाठी खाशाबाला काय करावे लागले असेल आणि कसे केले असेल ते त्यालाच ठाऊक.
त्यांनी स्पर्धेत कॅनडा, मेक्सिको, जर्मनी, जपान अशा देशातल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून कांस्यपदक मिळवले.
त्याकाळी फोनसारखी संपर्क साधनेच नव्हती. टीव्हीही नव्हता त्यामुळे श्री. खाशाबा दादासाहेब जाधव यांचे परतल्यावर लहानसे स्वागत झाले मात्र कराड आणि त्यांच्या गावी खूप उत्साहाने स्वागत केले गेले. १०१ बैलगाड्यांची मिरवणुकाही काढण्यात आली.
पुढे त्यांनी पोलीस खात्यात २७ वर्ष नोकरी केली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांना पेन्शनसाठी सुद्धा प्रयत्न करावे लागले. १४ ॲागस्ट १८८४ रोजी त्यांचे निधन झाले. आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला खरा पण त्यामुळे आर्थिक प्रश्न सुटले नाहीतच. कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी खाशाबांच्या विधवा पत्नीला त्यांचे ॲालिम्पिक पदकही विकावे लागले.
खाशाबांनी कांस्यपदक मिळवल्यावर पुढचे ॲालिम्पिक वैयक्तिक पदक मिळवायला भारताला ५० वर्षे वाट पाहावी लागली !
त्यांच्या स्मरणार्थ दिल्ली इथल्या कुस्ती स्टेडीयमला के डी जाधव स्टेडीयम असे नाव देण्यात आले आहे, इतकीच काय ती या विक्रमवीराची स्मृती आपण जपली आहे.
डॉ.भारतकुमार राऊत