गणपती विसर्जन करताना बुडालेल्या अडूरमधील दोघांच्या कुटुंबियांचे आ.भास्कर जाधव यांच्याकडून सांत्वन
वैयक्तिक आर्थिक मदतीचा हातभार,
शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन
ओंकार रेळेकर-चिपळूण
गुहागर तालुक्यातील बोऱ्या याठिकाणी गौरी- गणपती विसर्जन करताना समुद्रात बुडालेल्या वैभव वसंत देवाळे आणि अनिकेत हरेश हळ्ये या तरुणांच्या कुटुंबियांचे आज मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी अडूर-भाटलेवाडी येथे जाऊन सांत्वन केले. मासेमारी करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या या दोन्ही कुटुंबियांना त्यांनी वैयक्तिक आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि शासनाच्या स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री यांच्याकडून खास बाब म्हणून अधिकची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
अडूर भाटलेवाडी येथील ग्रामस्थ गौरी गणपती विसर्जनासाठी बोऱ्या समुद्रकिनारी गेले होते. त्यावेळी वैभव देवाळे आणि अनिकेत हळ्ये या दोन तरुणांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आमदार जाधव यांनी आज दोन्ही कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असताना आमदार जाधव हे आल्याने गावातील बहुतांश मंडळी एकवटली. दोन्ही घरांमध्ये ते पोहोचले तेव्हा कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. यातील एका कुटुंबातील महिलेने 'आमचा कर्ता-सवरता मुलगा गेला, आता तुम्हीच आमचे कुटुंबप्रमुख' असे उद्गार काढले आणि हे ऐकताच त्यांचेदेखील डोळे पाणावले. दोन्ही कुटुंबाना त्यांनी धीर दिला आणि कायम तुमच्या पाठीशी राहीन, असा शब्द दिला.
आम्ही कायम तुमचे ऋणी
यावेळी गावातील अनेक ग्रामस्थ आ. श्री. जाधव यांना भेटले. खासकरून अनेक मुंबईकर चाकरमानी यामध्ये होते. त्यांनी 'कोरोनाच्या काळात मुंबईत अडकलो असताना आम्हाला गावी येण्यासाठी आपण केलेली मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही. कोरोनामुळे नंतर आम्ही आपल्याला भेटू शकलो नाही, पण आपण मदत केली नसती तर मुंबईत आमचे खूप हाल होत होते, आम्हाला जगणं असह्य झालं होतं. आपण त्यातून आमची सुटका केलीत. आम्ही कायम तुमच्या ऋणात राहू', असे उदगार काढले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रवीण ओक, माजी उपसभापती श्री. पांडुरंग कापले, श्री. सीताराम ठोंबरे, श्री. प्रमोद हळये, श्री. एकनाथ हळये, श्री. प्रभात रांजाणे आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.