नरवीर तानाजी मालुसरे स्मृतिस्थळाचे नित्य पूजारी ह. भ. प. केशवबुवा कळंबे यांचे निधन
महाराष्ट्र मिरर टीम-रायगड
रायगड जिल्हा पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे स्मृतिस्थळ आणि भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे नित्य पूजा अर्चा करणारे ह भ प केशवबुवा हरी कळंबे यांचे दि. ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथील जे जे हॉस्पिटलमध्ये वयाच्या ७२ व्या वर्षी अस्थमाच्या आजाराने दुःखद निधन झाले.
रायगड जिल्हा परिषदेच्या रायगड किल्ला पूजा निधी ट्रस्टच्या वतीने केशवबुवा यांची नेमणूक झाल्यानंतर गेली ४० वर्षेहून अधिक वर्षे ते समाधी स्थळाची नित्यनियमाने पूजा करीत होते. शिवकालीन कुणा योध्याचे अशी नित्यनियमाने पूजा-अर्चा महाराष्ट्रात झाली नसेल. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, प्रतापगड, चंद्रगड, कांगोरीगड यांचा इतिहास ते येणाऱ्या शिवप्रेमींना स्वाभिमानाने सांगीत असत. त्याचबरोबर गावातील मंदिराच्या देखभालीसह इतर दैवतांची पुजाही त्यांनी केली. अत्यंत शांत व संयमी असणारे हे व्यक्तिमत्त्व प्रवचन आणि किर्तनकार सुद्धा होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, व दोन मुलगे,सुना व नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रेला रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, पोलादपूर तालुका शिवसेना प्रमुख निलेश अहिरे, शेकापचे ज्येष्ठ नेते निवृत्ती उतेकर, नरवीर युवक प्रतिष्ठानचे अनिल मालुसरे, ह.भ.प. आनंदबुवा झाडाणे आदी समाजातल्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.