Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कडाव- चांधई- भिवपुरी रस्ता खड्यात कोट्यावधींचा मलिदा कुणाच्या मुखी ? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

 कडाव- चांधई- भिवपुरी रस्ता खड्यात 

 कोट्यावधींचा मलिदा कुणाच्या मुखी ? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

               नरेश कोळंबे-कर्जत

  

कर्जत तालुक्यातील चांधई भिवपुरी ह्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर ह्या रस्त्याच्या कामासाठी  8 कोटी 42 लाख एवढी मोठी रक्कम मंजूर करण्यात आली  परंतु सदर रस्त्याचे काम काही दिवस केल्यानंतर ते अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे अर्धवट बनलेल्या रस्त्याचे खड्ड्यात रूपांतर झाले आहे . कोट्यवधींचा असलेल्या ह्या रस्त्याची गेल्या सहा महिन्यात तीनदा डागडुजी करण्यात आली आहे. डांबरीकरण करून फक्त 2 महिने उलटले असून तो देखील पूर्ण खराब झाला असल्याने ह्या रस्त्याचा वापर फक्त पैसे कमावण्यासाठी होत असल्याचं मत ग्रामस्थ मांडत आहेत .

      कर्जत मधील भिवपुरी हे स्थानक परिसरातील सर्व शिक्षण घेणारे विद्यार्थी,  मजूर , कामगार वर्ग तसेच दुध विक्री करण्यासाठी बाहेर जाणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचे स्थानक आहे. म्हणूनच चांधईच्या आसपास असलेल्या सर्व गावांसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा व कमी खर्चिक असा असल्याने सर्व जण ह्याच रस्त्याचा वापर करतात. परंतु रस्ता अतिशय खराब झाल्याने ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केली होती त्या नंतर ह्या रस्त्यासाठी व अंतर्गत पुलासाठी 8 कोटी 42 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. सदर रस्ता मंजूर होऊन 2 वर्ष होऊन गेले तरीही ह्या रस्त्याचे कामकाज काही पूर्ण झाले नाही. कंत्राटदाराने काही दिवस काम केल्यानंतर जुन्या रस्त्याला मोठ्या खडीने भराव टाकण्यात आला होता .परंतु काही भागात डांबरीकरणाचे काम चालू असतानाच कंत्राटदारांकडून ते काम पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

त्यामुळे जिथे खडीकाम झाले आहे अश्या ठिकाणी खडी रस्त्यावर आली आहे व काम न झाल्याने रस्त्याची झीज होऊन रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये चांधई व चिंचवली गावामध्ये  खड्डे झाल्याने खड्ड्यातील खराब पाणी घरात उडत आहे. रस्त्या अंतर्गत उक्रुळ तलाव व  चांधई येथील कमान या ठिकाणी मोठे खड्डे झालेले आहेत .चांधई नदीवरील पुलावर देखील मातीची झीज झालेली असल्याने मोठे खड्डे   या ठिकाणी पडले आहेत व यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मंजूर झालेला निधी गेला कुठे? रस्ता पूर्ण न करता त्याची दर दोन महिन्याला डागडुजी का करण्यात येते? रस्ता पूर्ण झाला नसल्यास कंत्राटदाराला मोबदला कसा मिळाला ? असे अनेक संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारले  जात आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies