साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून विनम्र अभिवादन
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी दिलेल्या संदेशात ते म्हणतात की, हे वर्ष अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. यानिमित्ताने लोकशाहीर अण्णा भाऊंना मानाचा मुजरा. अण्णा भाऊ हे केवळ कलावंत नव्हते, तर त्यांनी लेखक, कवी, लोकशाहीर म्हणून समाजातल्या विषमतेवर बोट ठेवले, कष्टकऱ्यांच्या व्यथांना आवाज दिला.
आपल्या पोवाड्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम मना-मनात पोहचवली. आपल्या श्रेष्ठ साहित्यकृतीतून मराठी आणि महाराष्ट्राची वैशिष्ट्ये जगभरात पोहचवली. अण्णा भाऊंचे हे योगदान कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेच आहे. अशा महान साहित्यरत्न अण्णा भाऊंना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.