चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी श्रीवर्धन आगारची लालपरी सज्ज!!
खाजगी अनाधिकृत वाहतुकीची लुटमार थांबणार
नागरिकांनी सेवेचा लाभ घ्यावा- आगार प्रमुख तेजस गायकवाड
अमूल कुमार जैन-मुरुड
गौरी गणपतीला गावी आलेल्या गणेश भक्ताच्या परतीच्या प्रवासासाठी श्रीवर्धन आगार सज्ज झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बहुसंख्य लोक कामधंदा, व नोकरी निमित्त बोरिवली,नालासोपारा,विरार, ठाणे ,भांडुप , मुंबई आणि उपनगरामध्ये वास्तव्य करून आहेत. गौरी गणपती हा कोकणातील सर्वात मोठा उत्सव आहे. प्रत्येक घरातील व्यक्ती गौरी गणपती च्या उत्सवासाठी दरवर्षी प्रमाणे आपल्या गावी येतो. गौरी गणपतीच्या सणा निमित्त आलेल्या सर्व भाविकांना पुन्हा त्याच्या कामगिरी वर हजर होण्यासाठी श्रीवर्धन आगारातून आगामी पाच दिवस जवळपास सहा हजार किमी ची जादा वाहतूक नियमित करण्यात येणार आहे तसेच जिल्हा बाह्य वाहतूकीला राज्य सरकार ने मान्यता दिली असून पुणे ५:००, सातारा ०५:४५, नालासोपारा (०७:०० व १३:००), बोरिवली ०८:३० व ११:०० ,मुंबई ०४ :०० ,०५:००,०८:०० , ११:४५ तसेच दिघीवरून ०४:०० ,२०:०० या नियमित फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.तसेच ग्रामीण भागातील गावगाडा पूर्ववत करण्याच्या दुष्टीकोनातून तोरडी वस्ती, माणगाव वस्ती , कुडा वस्ती, नानवेल वस्ती , दिघी वस्ती ,या रात्रवस्तीच्या बसेस सुरु केल्याचे आगार प्रमुख तेजस गायकवाड यांनी सांगितले. श्रीवर्धन आगारातील वाहतूक निरीक्षक शर्वरी लांजेकर, वाहतूक नियंत्रक दीपक जाधव, कार्यशाळा प्रमुख प्रदीप विचारे यांनी जादा वाहतुकीसाठी धोरणात्मक भूमिका घेत जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक करण्याच्या दृष्टिकोनातून बसेसचे वेळापत्रक तयार केले आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी बोर्लिपंचतन, म्हसळा, व श्रीवर्धन या सर्व ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्षाची सुयोग्य मांडणी करण्यात आली आहे. कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकारच्या निर्देशानुसार २३ मार्च पासून श्रीवर्धन आगारातील प्रवाशी वाहतूक बंद होती त्यावेळी अनाधिकृत खाजगी वाहतुकदारांनी प्रवाशांची लूटमार केली प्राप्त माहितीनुसार बोर्ली ते आदगाव ४०० रुपये तसेच बोर्ली ते सर्वा ६०० रु प्रति फेरी प्रवास भाडे आकारले गेले. म्हसळा मादाटने ६० रु प्रति व्यक्ती व श्रीवर्धन , म्हसळा तालुक्यातील कारविणे, गडबवाडी, कोलमांडला, तळवडे, कोन्दरी, पानवे, केल्टे, सांगवड, रुद्रावट, गाणी, कोलवट, भापट, रोहिणी, तुरबाडी, काळसुरी, वारळ, चिरगाव या सर्व आडमार्गावर एस टी बंद असल्याने अनधिकृत खाजगी वाहतुकदारने आवाची सव्वा प्रवासभाडे आकारले. अवाजवी तिकीट दरामुळे सर्वसामान्य व्यक्ती जेरीस आला होता. त्याचा शहराशी संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला होता. श्रीवर्धन आगारातील शहरी व ग्रामीण वाहतूक सेवा पूर्ववत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गौरी गणपती सण व त्यासोबत पूर्वीचे नियते पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जनतेला माफक दरात प्रवासी वाहतूक देण्यासाठी एसटी प्रशासन कटिबद्ध आहे. ज्या मार्गावर ती प्रवासी असतील त्या मार्गाला प्राधान्यक्रम दिला जाईल. जनतेने सहकार्य करावे ही विनंती...... तेजस गायकवाड( आगार प्रमुख श्रीवर्धन)
प्रवाशांसाठी बोर्लिपंचतन वाहतूक नियंत्रण कक्षात मॅन्युअली पद्धतीने तिकीट विक्री सुरू आहे . ग्रामीण भागातील जास्तीत जास्त प्रवाशांना उत्तम व दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज आहे..... रवींद्र मोरे ( वाहतूक नियंत्रक बोर्लिपंचतन )