महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. अन्यथा बोंबाबोंब आंदोलन सुरू करू
शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत
ओंकार रेळेकर-चिपळूण
सावर्डे बाजारपेठेतील व्यापारी दुकाने,खोके इमारती तोडून ठेवून त्या व्यापाऱ्यांना गेले तीन वर्षे वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.त्यांना तात्काळ भरपाई द्या जेणेकरून ते आपले व्यवसाय सुरू करतील.तसेच मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून अपघातांना कारणीभूत ठरलेले संबंधित ठेकेदार आणि त्यांना अभय देणारे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा.अन्यथा १५ ऑक्टोबर पासून महामार्गावर बोंबाबोंब आंदोलन सुरू करून सळोकीपळो करून सोडू असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिला आहे.
या बाबत संदीप सावंत यांनी थेट केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना लेखी पत्र पाठवून चिपळूण सावर्डे येथील वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे.सुमारे चार वर्षांपूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सावर्डे बाजारपेठेत बहुतांश जमीन संपादित करण्यात आली.या जमिनीत असलेले इमारती,बांधकामे,दुकान गाळे,खोके,बाजूला करण्याचे आदेश देण्यात आले.काही व्यापारी नागरिकांनी स्वतः बांधकामे इमारती हटवले तर काहींची बांधकामे संबंधित विभागाच्या आदेशानुसार ठेकेदाराने जमीनदोस्त केली.
गेले तीन चार वर्षे सावर्डे येथील बाजारपेठ पूर्णपणे उद्धवस्त अवस्थेत पडलेली आहे.येथील अनेकांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.वेगवेगळ्या अडचणी पुढे करून त्यांचा मोबदला रोखून ठेवण्यात आला आहे.त्यामुळे येथील व्यापारी छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत.संबंधित विभाग कोणतेच हालचाली करताना दिसत नाही.काम ही सद्या बंद आहे.त्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असल्याचे संदीप सावंत यांनी पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.
तसेच मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून रोज अपघात होत आहेत.येथील परशुराम ते अारवली पर्यंतचे काम चेतक कंपनीकडे असून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी देखील त्यांचीच आहे.परंतु या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले जात असून त्यांना राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी देखील अभय देत आहेत.त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर आणि ठेकेदारवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी ना.गडकरी साहेबांच्याकडे केली आहे.
सावर्डे येथील व्यापारी नागरिकांना तात्काळ भरपाई आणि महामार्ग दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून अपघातांना कारणीभूत ठरलेल्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत तर १५ ऑक्टोबर पासून मुंबई गोवा महामार्गावर बोंबाबोंब आंदोलन सुरू करू आणि त्यावेळी आपल्या विभागाची बदनामी झाल्यास किंवा त्याचे वाईट परिणाम निघाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी येथील संबंधित अधिकारी आणि ठेकेदारवर राहील असा स्पष्ट इशारा देखील संदीप सावंत यांनी दिला आहे.