सांगली जिल्ह्यातील मृत्यू दर जगातील सर्वाधिक : प्रशासन ढिम्मच
उमेश पाटील-सांगली
आजअखेर कोरोनाने 735 जणांचा मृत्यू झाला. अवघ्या 15 दिवसांत मृत्यूचे प्रमाण दुप्पट झाले असून, आज सांगली जिल्ह्याचा मृत्यूदर 3.82% पर्यंत गेला आहे. बरे होण्याचे प्रमाण तर 15 दिवसांत 66 टक्क्यांवरून 52.49% वर आले आहे.
रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचे बेड मिळेनात. तरीही प्रशासन ढिम्म असा कारभार सुरू आहे. अद्याप जम्बो हॉस्पिटल आणि उपचाराच्या नियोजनाचे कागदी खेळ सुरूच आहेत.
मृत्यूची माहिती ....
रोज 35-40 जणांचे मृत्यू होत आहेत. गेल्या 15 दिवसांत मृत्यूची संख्या 383 वरून तब्बल 735 वर गेली आहे.
यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 327, शहरी भाग (महापालिका वगळून) 108 आणि ग्रामीण भागातील 300 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रूग्ण बरे होण्याच्या बाबतीत जिल्हा राज्यात 26 वा आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची गरज मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.
2000 बेड ची गरज
पालकमंत्र्यांनी 75 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिल्याचे जाहीर केले. परंतु दररोज मृत्यूचे आणि रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता व्हेंटिलेटर्स तोकडेच पडत आहेत.
एकूण ही परिस्थिती पाहता तातडीने शासनपातळीवर प्रयत्न करून गतिमान पद्धतीने किमान हजार-दोन हजार बेडचे हॉस्पिटल उभारायला हवे होते.
पालकमंत्र्यांची फक्त घोषणाच !
पालकमंत्र्यांनी मुंबई, केरळसह अन्य ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने तेथून तज्ज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टाफसह यंत्रणा देण्याची घोषणा केली. तीही हवेतच विरली आहे. अशा कारभाराने आरोग्य पंढरी सांगली प्रशासनाच्या उदासीन कारभाराने देशात मृत्यूदरात आघाडीवर पोहोचली आहे, हे लाजीरवाणे आहे.