जेव्हा माणूस जागा होतो!
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
ठाणे जिल्ह्यातील पिचलेल्या, नडलेल्या आदिवासी जनतेची 'गोदुताई' बनून अव्याहतपणे त्यांच्याच कल्याणासाठी झटलेल्या गोदुताई उर्फ काॅ. गोदावरी परुळेकर यांचा आज २४ वा स्मृतिदिन. त्यांच्या सेवामयी स्मृतींना लाल सलाम!
डहाणू, जव्हार, तलासरी, वाडा या जंगलपट्ट्यात वर्षानुवर्षे अंधश्रद्धा, निरक्षरता, सावकारी पाश व सरकारी कचखाऊ धोरण यात खितपत पडलेल्या आदिवासी समाजाला 'माणसात' आणण्याचे कार्य गोदुताईंनी केले.
त्यासाठी हयातीतील बव्हंश काळ त्या सर्व शहरी सुखांचा त्याग करून खेड्यांतच राहिल्या व जंगलांच्या कुशीत वसलेल्या पाड्यांवर वणवण भटकत राहिल्या.
१४ ॲागस्ट १९०७ रोजी जन्मलेल्या गोदुताईंनी कायद्याचे शिक्षण घेतले व त्या देशातील पहिल्या महिला वकील बनल्या. पण वकिली करण्याऐवजी त्या समाजकार्यात उतरल्या. कै. ना म जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मुंबईत कामगार चळवळीत काम केले.
पण त्यांचे मन आदिवासी पाड्यांवरच रमले व त्यांनी भारतीय किसान सभेतर्फे तिथेच कार्य सुरू केले. रचनात्मक कार्याबरोबरच आंदोलन व लढ्यांवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी आदिवासींच्या मागण्यांसाठी लढाही उभारला.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgr72FHNHXlxbvDY5CeKKPOmsDAlQiKDd7_4dx2I7s4Y-VFso_D2mubkyAlVHwfIV9Wl4SHFSuJ6OFSBt-ioXcm_jmd6BonyYv3RTPPd_V5YXHGPWmRUfl6U09-LXF8M9dWvVt7V7wUhwTb/w162-h200/FB_IMG_1602125682984.jpg)