Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

वीर पत्नी लक्ष्मीबाई यशवंतराव घाडगे यांचे शंभराव्या वर्षी वृध्दापकालाने निधन

वीर पत्नी लक्ष्मीबाई यशवंतराव घाडगे यांचे शंभराव्या वर्षी वृध्दापकाळाने निधन

 रविंद्र कुवेसकर -माणगांव


माणगांव पाटणुस येथे वयाच्या शंभराव्या वर्षी वृध्दपकालाने वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांचे शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा आठचे सुमारास त्यांचे राहते घरी निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी ०५.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी पुणे येथुन आर्मीचे जवान व अधिकारी हजर राहणार असुन मरणोत्तर व्हिक्टोरिया क्राॅस विजेते यशवंत घाडगे यांच्या वीर पत्नीस त्यांच्या तर्फे मानवंदना देण्यात येणार आहे.


यशवंत बाळाजी घाडगे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात पळसगाव-आंब्रेची वाडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव विठाबाई होते. वडील बाळाजीराव हे गरीब शेतकरी होते. या जोडप्याला दोन मुले व चार मुली अशी सहा अपत्ये होती. यशवंत अवघ्या तीन महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे निधन होण्यापूर्वी यशवंतचा मोठा भाऊ वामन हा सैन्यात भरती झाला होता. त्यामुळे त्याचा तुटपुंजा पगार हाच या कुटुंबाचा आधार होता. कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी विठाबाईंना शेतात काम करावे लागले व मोलमजुरी करावी लागली. यशवंतने शिकून पुढे चांगले नाव कमवावे असे त्यांना वाटत होते. 

त्यामुळे यशवंतला त्यांनी पळसगावच्या मराठी शाळेत घातले. वयाच्या अकराव्या वर्षी यशवंत मराठी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाला. उच्च शिक्षणासाठी शहरात जाणे हे गरिबीमुळे अशक्य होते. त्यामुळे यशवंत लोकांच्या शेतांवर मोलमजुरी करू लागला. सहा वर्षांनंतर थोरला भाऊ वामन निवृत्त होऊन गावी परतला, तेव्हा आपणही भावाप्रमाणे सैन्यात जावे असे यशवंतला वाटू लागले. तसा त्याला लाठी, बोथाटी व दांडपट्टा फिरवणे व कसरत करण्याची आवड होती. त्याची शरीरयष्टी सडपातळ, काटक आणि मजबूत होती. मात्र यशवंतने सैन्यात जावे असे विठाबाईला वाटत नव्हते. पण वामनचा आग्रह व यशवंतचा निग्रह यांमुळे विठाबाईचा नाइलाज झाला. यशवंतने लग्न केल्यास आपण त्याला सैन्यात जाण्यास परवानगी देऊ अशी अट विठाबाईने घातल्यामुळे यशवंतला लग्न करावे लागले. 

पाटणूसच्या पांडुरंग महामुणकरांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी त्याचा विवाह झाला. दुसर्‍या महायुद्धाचे वारे वाहू लागल्यावर सैन्यात भरती सुरू झाली. तेव्हा १९३८ साली यशवंत घाडगे पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये साधे शिपाई म्हणून दाखल झाले. त्यांनी कडक सैनिकी प्रशिक्षण घेऊन आपल्यावर सोपविलेल्या लहानमोठ्या कामगिर्‍या व विशेष अवघड जबाबदाऱ्या अतिशय कौशल्याने व तत्परतेने पार पाडल्या. त्यांच्या अंगभूत गुणांमुळे त्यांना लवकरच नाईक पदावर बढती मिळाली. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश फौजां सोबत लढण्या साठी पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीला इटलीत पाठविण्यात आले. 

तेथे ब्रिटिश फौजेला इटली व जर्मनीच्या फौजेशी लढायचे होते. १० जुलै १९४४ रोजी जर्मन सैन्याच्या एका तुकडीसोबत नाईक यशवंतरावांच्या सैन्याची गाठ पडली. दोन्ही बाजूंनी बंदुका, टॉमीगन्स, तोफा धडधडू लागल्या. शत्रूच्या ताब्यात असलेले ठाणे जिंकून घेण्याच्या ईर्ष्येने मराठा पलटण पुढे सरकत होती. यशवंत घाडगे यांनी हातबाँब फेकून शत्रूची मशीनगन बंद पाडली. ठाण्याचे रक्षण करणारे अनेक जर्मन सैनिक त्यांनी यमसदनी पाठविले. आपल्याच कैफात घाडगे पुढे सरकत चालले होते.

अचानक आपल्याकडील काडतुसे व हातबाँब यांचा साठा संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता ते ठाण्याच्या अगदी जवळ आले होते. त्यांनी मग मागचा-पुढचा विचार न करता आपली बंदूक उलट धरून शत्रूच्या सैनिकांवर झेप घेतली. बंदुकीच्या दस्त्याने हाणामारी करून ते शत्रुसैनिकांना लोळवू लागले. त्यांचा त्वेष पाहून शत्रुसैनिक माघारी पळू लागले. त्यांच्या पलटणीने शर्थ करून ते ठाणे काबीज केले. आपला विजय झाल्याचे लक्षात आल्यावर घाडगे यांनी क्षणभर थांबून मोकळा श्वास घेतला. त्यांचा संपूर्ण देह रक्ताने न्हाला होता. ते शांतपणे उभे राहिल्याचे पाहून जवळच्या खंदकात लपलेल्या एका जर्मन सैनिकाने संधी साधून त्यांच्यावर गोळी झाडली. या गोळीने अचूक वेध घेतला व घाडगे खाली कोसळले. क्षणार्धात त्यांची प्राणज्योत मावळली. 


ब्रिटिश सरकारला त्यांच्या या पराक्रमाची दखल घ्यावी लागली. लाल किल्ल्या समोरील मैदानात भरलेल्या दरबारात त्यांना ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला. व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल फील्ड मार्शल लॉर्ड वेव्हेल यांच्या हस्ते घाडगे यांच्या वीरपत्नी लक्ष्मीबाईंना हे मानाचे पदक प्रदान करण्यात आले. या वीर पत्नीच्या पश्ताच कोणीही नसुन नातेवाईक व त्यांचे भाचे लक्ष देतात. ऐन तारुण्यात त्याकाळी लहान वयातच वीर पत्नी लक्ष्मीबाईंच्या नशिबी वैधव्य आले. नाईक यशवंतराव घाडगे यांच्या स्मरणार्थ माणगांवच्या मामलेदार कचेरी जवळ त्याकाळी त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तेथे दरवर्षी ९ जानेवारीला ‘घाडगे महोत्सव’ साजरा करण्यात येतो. आज याच ठिकाणी माणगांवकर व वीर यशवंत घाडगे माजी सैनिक संघटनेच्या मागणी वरुन प्रांत प्रशाली दिघावकर यांच्या कार्यकालात पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांच्या पाठपूराव्या मुळे अत्यंत देखणे स्मारक माणगांव येथे उभे राहिले असुन यंदा या ठिकाणी ९जानेवारी रोजी कोव्हिड परिस्थितीमुळे अत्यंत साधेपणात घाडगे उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जास्त वयोमान असल्याने व प्रकृती अस्वास्थ्यामुळे लक्ष्मीबाई या कार्यक्रमास यंदा हजर नव्हत्या. 


आपल्या शहिद पतीचे नव्याने जिर्णोध्दार झालेल्या देखण्या स्मारकाचे दर्शन मात्र त्यांना घेता आले नाही. लहान वयातच वैधव्य नशिबी आले, मुलबाळं न झाल्याने उभे आयुष्य न डगमगता स्वावलंबनाने एकाकी खडतर आयुष्य जगणाऱ्या माणगांव येथील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांच्या वयोवृद्ध पत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांना व्यवस्थित निवृत्तीवेतन मिळत नव्हते याची शासन स्तरावर दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, वीर पत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या एका बातमीच्या अनुषंगाने माणगांव तहसीलदार प्रियंका आयरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना कुठल्या अडचणी येत आहेत, याविषयी विचारणा करण्यास सांगितले होते. 


तहसीलदार प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. वीर पत्नी लक्ष्मीबाई या १०० वर्षांच्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे जाऊन त्यांची व्यवस्थित विचारपूस केली व वैद्यकीय उपचार मिळत आहेत किंवा नाही ते पाहिले. सध्या त्यांच्यावर कौटुंबिक डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. लक्ष्मीबाई यांना स्मृतिभंशाचा आजार असून सध्याचे उपचार पुरेसे आणि योग्य आहेत, असे त्यांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाइकांनी सांगितले होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहिती नुसार वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना १३ हजार २५० निवृत्तीवेतन आणि मुख्यमंत्री निधीतून तितकेच म्हणजे १३ हजार २५० असे एकूण २६ हजार २५० रुपये मासिक वेतन मिळते, यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. माणगांवातील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांचे स्मारक देखील सुस्थितीत आहे, या ठिकाणी त्यांचा जन्मोत्सवदेखील व्यवस्थित पार पडतो, अशी माहिती तहसीलदार आयरे यांनी त्यावेळी दिली होती.

वीर पत्नी लक्ष्मी बाईंचे आज अंतिम-संस्कार नंतर दि. १३ फेब्रुवारीला त्यांचे सावडणे व २० फेब्रुवारी रोजी दशपिंडी विधी व २३ फेब्रुवारीला उत्तरकार्य संपुर्ण विधी त्यांचे राहात्या घरी पाटणुस येथे होणार असल्याची माहीती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies